सांगली अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
पुढील वर्षापासून सभासदांना १० टक्के लाभांश देणार – अध्यक्ष गणेश गाडगीळ

सांगली प्रतिनिधी :- सांगली अर्बन को ऑप. बँकेची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२३ ऑगस्ट रोजी भावे नाट्यमंदिर येथे खेळीमेळीत संपन्न झाली. बँकेने संचित तोटा भरुन काढून बँकेला 6 कोटी 82 लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. पुढील वर्षीपासून सभासदांना किमान १० टक्के इतका लाभांश देण्याची ग्वाही अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांनी यावेळी बोलताना दिली. ठेवी, कर्ज, गुंतवणूक, वसुली अंतर्गत कामकाज या चौफेर प्रगतीमुळे बँकेस “अ” वर्ग मिळाला असल्याची माहिती गाडगीळ यांनी दिली. अध्यक्ष गाडगीळ म्हणाले, यावर्षी सांगली अर्बन बँकेने मागील वर्षाअखेरचा पूर्ण संचित तोटा 17 कोटी 42 लाख इतका भरुन काढून 31 मार्च 2024 अखेर 6 कोटी 82 लाख इतका निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेचे नेट एन.पी.ए चे प्रमाण कमी होऊन 1.78 टक्के पर्यत खाली आहे, ठेवीमध्ये 75 कोटी 84 लाख व कर्जामध्ये 44 कोटी 7 लाखाची वाढ झाली आहे. गणेश गाडगीळ म्हणाले, मार्च 2024 अखेर बँकेच्या ठेवी 1181 कोटी 19 लाख इतक्या झाल्या आहेत, कर्जे 694 कोटी 54 लाख इतकी दिली आहेत. बँकेची गुंतवणूक 491 कोटीची झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 1876 कोटी झाला आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण मागील वर्षाच्या 2.94 टक्केवरुन 1.16 टक्केनी कमी होऊन 1.78 टक्के झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार यावर्षी नेट एनपीए चे प्रमाण 3 टक्केच्या आत आहे, पुढीलवर्षी बँकेने शून्य टक्के एनपीए करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. बँकेने सभासदांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आय.एफ.एस.सी कोड, भांडवली खर्च, नविन शाखा, डाटा सेंटर यासह अनेक गोष्टी सक्षम करणार आहे. सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष गाडगीळ ,उपाध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे यांच्यासह मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयाचे वाचन केले. यावेळी श्रीकृष्ण माळी, जगदीश कालगावकर, हरिदास पाटील, एस.एल. पाटील आदि सभासदांनी कामकाजात सहभाग घेतला. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गाडगीळ यांनी विस्तृतपणे उत्तरे दिली. सभेचे सुत्रसंचालन संदिप कुलकर्णी यांनी केले. यावेळी संचालक सी.ए अनंत मानवी, डॉ.रविंद्र आरळी, हणमंत पाटील, संजय पाटील, शैलेंद्र तेलंग, संजय धामणगांवकर, रणजित चव्हाण, कालिदास हरिदास, सागर घोंगडे, सतीश मालू, विश्वाास चितळे, सौ.स्वाती करंदीकर, सौ.अश्विनी आठवले, रविंद्र भाकरे, मनोज कोरडे, सी.ए सागर फडके आदी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर उपस्थित होते.